Sunday, September 30, 2012

का तिला इतका बिलगतो पावसाळा

पावसा रे हा तुझा भलताच चाळा
का तिला इतका बिलगतो पावसाळा

मळभ इतकी कोठुनी घेऊन येतो
कूळ काळे पावसाचा जन्म काळा

हा ॠतू आहे निसरड्या पावलांचा
मग कशाला सभ्यतेचे नियम पाळा

खेळ पट्ट्यांनाच तो भिजवून जातो
शेतकी साठी कितीही जीव जाळा

दाटतो अलगद तिच्या डोळ्यामधे अन्
ओलसर करतो मनाचा पोटमाळा

...........मयुरेश साने....

अशी ही वेळ येते वाटते की बस तुझे व्हावे

मरण माझेच आयुष्यात माझ्या रोज डोकावे
अशी ही वेळ येते वाटते की बस तुझे व्हावे

सुखे असतील जर कोठे मला भेटू नका आता
कशाला मी तिचे व्हावे व्यथेशी गोड बोलावे

असे भलतेच काही चेहरे माझ्यात सापडले
खरा माझ्यातला मी कोण आता काय सांगावे

उशाशी स्वप्न माझे घेउनी निजतेस तू रात्री
अशी स्वप्ने मला पडती आता माझे कसे व्हावे

मला तू भेट आणी एकदा दे हासुनी टाळी
मनी जे दाटते ते हुंदक्यांनी मोकळे गावे

...मयुरेश साने

चांदणे इतक्याचसाठी टाळले होते

चांदणे इतक्याचसाठी टाळले होते
पौर्णीमेने एकदा मन जाळले होते

एकटे मज सोडुनी गेलीस तू जेव्हा
बाग रुसली बहर सारे वाळले होते

खूप काही बोलल्यावर एवढे कळले
नेमके बोलायचे ते टाळले होते

काळजाचा एक गहिवर अश्रू बनला अन्
पापणीने दुखः ही कवटाळले होते

मी जरी काट्यात आहे खंत नाही पण
तू मला कित्येक जन्मी माळले होते...
मयुरेश साने

खूप रडलो बस अता मी रडत नाही

दुख्ख आता पापणीला छळत नाही
खूप रडलो बस अता मी रडत नाही

शेवटी उरली तिजोरी बंद दुख्खे
ठेव सौख्याची मला परवडत नाही

जन्म अख्खा वाहण्यासाठीच नसतो
आसवांना एवढेही कळत नाही

धुगधुगी हरवून बसला कोळसा की
पेटवावा लागतो तो जळत नाही

वाटते कमळा प्रमाणे मी फुलावे
राहणे चिखलातले पण मळत नाही

जीवनाची सावकारी काय सांगू
हात जोडा पाय पकडा टळत नाही

.....................................मयुरेश साने
समजलो सहवास ज्याला तो खरा आभास होता
ओळखिच्या माणसांना ओळखिचा त्रास होता

घेतले होते जरी मी भरभरुनी श्वास ताजे
जीवनाची कोठडी अन् मृत्युचा गळफास होता

चालले मागील पानातुन पुढे आयुष्य माझे
तोच तो कंटाळवाणा लांबलेला तास होता

जन्मभर ओल्याच होत्या पापण्यांच्या ओंजळी अन्
जन्मभर माझ्या तृषेला मृगजळाचा ध्यास होता.


पाहिले जेव्हा तुला मी बस् पहातच राहिलो गं
पण किती कोट्यावधीचा अर्थ त्या शून्यास होता

....................................मयुरेश साने 

जीवनाची कैफियत कोणा पुढे मांडायची

न संपणारे प्रश्ण त्याची उत्तरे मी द्यायची
जीवनाची कैफियत कोणा पुढे मांडायची

जे जसे होते तसे मी निमुट स्वीकारायचो
जाणून होतो शेवटाला राख आहे व्हायची

आपले परके कुणाचा सोसही नव्हता मला
स्वाभिमानी दुख: माझी अश्रू सांभाळायची

जेवढे जमले मला मी तेवढा झालो तुझा
सांग किंमत जीवना मी कोणती मोजायची

मी तसा नाजुक मनाचा अन् तुझे न्याहाळणे
हरएक श्वासाला अता माझी दखल मी घ्यायची

.................................................................मयुरेश साने

आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

आठवांचा गाव आल्यावर असे चालायचे
आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

आपले नाते जणू की पान गळतीचा बहर
मी तुला माळायचे अन् तू मला टाळायचे

तान मुरक्या शब्द सारे चांगले असले तरी
फक्त आलापात असते जे खरे सांगायचे

लावला नाहीस तू ओठी जरी प्याला कधी

पण तुझ्या ओठात माझे जन्म फेसाळायचे

साद होती बोलकी पडसाद होता बोलका
पण तरी हातात नव्हते हात हाती घ्यायचे

.... मयुरेश साने

जगायचे ही जबाबदारी

कशी सरावी हयात सारी
जगायचे ही जबाबदारी

जगात येणे निघून जाणे
जसे कुणी हारतो जुगारी

पुन्हा तुझे स्वप्न सोबतीला
पुन्हा नव्याने सुरू उधारी

तुझाच मी अंश अंश देवा

पुढ्यात का मी तुझ्या भिकारी

पिऊन ही वाढतेच आहे
जगायची ही तहान न्यारी

सरळपणाला मिळेल शिक्षा
तुझे गुन्हे ही तुझी हुशारी

मयुरेश साने

Sunday, June 3, 2012


मागतो आहे तुला जरी मी दिवाण्यासारखा
ओठी तुझ्या येईन का कधी मी उखाण्यासारखा ?
वेडा बहर वेडी असोशी वेडेपिसे फुलपाखरू
एकटा वागू किती गं मी शहाण्यासारखा ?
एकदा सांगून जा ना जे तुला सांगायचे
हा तुझा रुसवा अबोला जीव जाण्यासारखा
दाद ही घेऊन गेले जीव घेणे थांबणे
दाटलेला हुंदका नाहीच गाण्यासारखा
तसबीर तू झालीस अन् तकदीर माझी संपली
आरसाही राहिला नाही पहाण्यासारखा
...मयुरेश साने..दि..२६- ऑक्टोबर-११

का पुन्हा येथे मरावे लागते
जर पुन्हा येथेच यावे लागते
नेमका येतो तुला भेटायला
अन् तुला तेव्हा निघावे लागते
काय आयुष्यात आहे आपले
सारखे माझे म्हणावे लागते
आठवांचा दाटतो पाऊस तेव्हा
हुंदक्यांचे गीत व्हावे लागते
खळखळूनी हासण्यासाठी सुधा
आसवांना गोठवावे लागते
पण मुखवट्याला जपावे लागते
तेव्हा विधात्यालाच यावे लागते
देव म्हणजे क्रूर काळ्या पत्थराला
जन्मभर काळीज द्यावे लागते

मखमली काटे जणू फुलवून जाते
हाय ती जेव्हा अशी लाजून जाते
मी रिकामा व्हायचो नाही कधीही
तीच उरते तीच ओसंडून जाते
दार करतो आठवांचे किलकिले मी
ती मनाचे कोपरे उजवून जाते
लांबतातच सावल्या बघ सांजवेळी
सावलीला हाक मारून ऊन जाते
दोन श्वासांचीच पडते आहुती पण
जन्मभरिची वासना पेटून जाते
........मयुरेश साने...११- मार्च-२०१२

शब्दातुन तू साकारावे असे वाटले
सहज बोलके गीत लिहावे असे वाटले
तुझा अबोला मला मुळीच न परवडणारा
तरी पुन्हा तू तसे रुसावे असे वाटले
आठवणींना देउन गेलीस तुझाच चेहरा
पुन्हा पुन्हा मी तुला पहावे असे वाटले
तुला खरेतर नकोच होते नाव ही माझे
उखाण्यात जे तुझ्या असावे असे वाटले
मृगजळ म्हणजे काय असे ते कळले तेव्हा
शोधत गेलो तुझे विसावे असे वाटले
मयुरेश साने

पुन्हा कसा टवटवीत झालो
तुझेच श्रावण भरून प्यालो
असा कसा मी तुझा निघालो
मला सुधा मी तुझा म्हणालो
जरा बसा म्हटले दु:खांना
सुखे म्हणाली आलो आलो
नवल असे काय त्यात आहे
तुझाच होतो तुझाच झालो
रिते रिते वाटलेच नाही
जसा जसा दु:खात बुडालो
गहिवरताना रहाट झालो
डचमळ डचमळ तुला मिळालो
कसे तरी हासतोय खोटे
स्वत:तुनी मी दूर पळालो
मयुरेश साने

एकटेपण आपले वाटे मला
होउ दे आता जरा माझे मला
कर्ज स्वप्नांचे तुझ्या फेडू कसे
आठवांचे तू दिले खाते मला
दोन भुवयांच्या मधे जे रेखले
पाहिजे होते तसे नाते मला
जीवना रे श्वासश्वासांच्या मधे
रोज दळते हे तुझे जाते मला
ऐकण्यासाठी मना तू कान हो
एकटेपण तेवढे गाते मला
.....मयुरेश साने

कोण कुठल्या सोबतीचे
श्वास नाही खातरीचे
हा खरा सिद्धांत आहे
जन्म सारे काळजीचे
हीच मिळकत जीवनाची
चार खांदे पालखीचे
शोध घेताना सुखाचा
दुखः झाले ओळखीचे
गोठले डोळ्यात अश्रू
प्रेम इतक्या तालमीचे
................................

Tuesday, May 1, 2012

जन्म गेला फाटके शिवण्यात आणी
ही तरीही उसवलेली जिंदगाणी

हुंदक्याना वाहिले आयुष्य जेव्हा
थांबले तेव्हा कुठे डोळ्यात पाणी

वाटते पुन्न्हा पुन्हा व्हावे अडाणी
आठवण आहे तुझी इतकी शहाणी

अडगळीचा कोपरा असलो तरीही
एकदा हटकून तू करते पहाणी

भर उन्हातच सावलीची भेट घेऊ
आयती थंडी किती कंटाळवाणी

पाहिजे आहे मला तू अन् तुला मी
सप्तजन्माला पुरेशी ही कहाणी

मयुरेश साने